Home महत्वाची बातमी जैवविविधता संरक्षणासाठी मानवाला प्रयत्न करावे लागतील डॉ.ए.बी.चौधरी यांचे एच.जे.थीम महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेत...

जैवविविधता संरक्षणासाठी मानवाला प्रयत्न करावे लागतील डॉ.ए.बी.चौधरी यांचे एच.जे.थीम महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेत प्रतिपादन..

100

शरीफ शेख – रावेर

जळगाव , दि. २२ :- सुमारे दोन हजार वर्षापूर्वी जगात जैवविविधता समृध्द होती. आज वृक्षतोड, मानवी हव्यासामुळे हि जैवविविधता नष्ट होत आता काही टक्केच शिल्लक राहिली आहे. जैवविविधता वाचविण्यासाठी मानवाला कृती कार्यक्रम हाती घेऊन जैवविविधतेचे संरक्षण करावे लागेल, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.ए.बी.चौधरी यांनी केले.

येथील एच.जे.थीम महाविद्यालयात एकदिवसीय “शाश्वत विकासात रसायनशास्त्र आणि पर्यावरण शास्त्राच्या नाविन्यपूर्ण कल्पना” याविषयी राष्ट्रीय परिषद घेण्यात आली. परिषदेचे उद्घाटन डॉ.ए.बी.चौधरी यांनी केले, त्यावेळी ते बोलत होते. मंचावर अध्यक्षस्थानी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.करीम सालार तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव अ.गफ्फार मलिक, हैद्राबाद येथील शास्त्रज्ञ डॉ.जव्वाद पटेल, पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. पी.पी. वडगावकर, मुंबई विद्यापीठाचे डॉ.एन.जी.शिंपी, प्राचार्य डॉ.सय्यद शुजाआत अली, महाविद्यालय विकास समिती चेअरमन डॉ.इक्बाल शाह, डॉ.ताहेर शेख उपस्थित होते.

सुरुवातीला “तराना ए इकरा” हे संस्थेचे गीत तुनज्जा शेख व सहकाऱ्यांनी सादर केले. प्रस्तावनेत परिषदेचे समन्वयक डॉ.मुस्तकीम बागवान यांनी परिषद घेण्यामागील भूमिका विशद करीत या परिषदेतून पर्यावरण व रसायनशास्त्रमधील विविध समस्या व उपाय यावर मंथन होण्याचा उद्देश सांगितला. यावेळी दीपप्रज्वलन करून परिषदेचे डॉ.चौधरी यांनी उद्घाटन केले. तसेच शोधनिबंधाच्या पुस्तिकेचे मान्यवरांनी प्रकाशन केले. यावेळी बोलताना डॉ. ए.बी.चौधरी बोलताना पुढे म्हणाले की, पृथ्वीला प्रदुषणापासून रोखणे प्रत्येक मानवाचे आद्यकर्तव्य असून यासाठी स्वत:च्या घरातून सुरुवात केली पाहिजे. नैसर्गिक चक्रात येणाऱ्या प्रत्येक सजीव घटकाला जगण्याचा अधिकार असला तरीही मनुष्याने स्वार्थीपणाने जंगलतोड करीत तसेच घातक पदार्थांचा वापर अधिक वाढविल्याने पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्राचे जीवन धोक्यात आलेले आहे, असेही डॉ.चौधरी म्हणाले.

यावेळी गफ्फार मलिक, डॉ.इक्बाल शाह यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ.करीम सालार यांनी, विज्ञान हे मानवता सेवेचे नाव आहे असे सांगत मानव प्रगती करीत चंद्रावर पोहोचला मात्र त्याला जमिनीवरील स्वर्ग कायम टिकविता आला नाही असे सांगितले. सूत्रसंचालन डॉ.आएशा बासित यांनी केले. आभार प्रा.साजिद मलक यांनी मानले.

बीजभाषण – पुणे येथील राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळाचे शास्त्रज्ञ डॉ. पी.पी. वडगावकर यांनी, आरोग्य व कृषीक्षेत्रात रसायनशास्त्राचे मोठे योगदान आहे. प्राचीन काळी अग्नीचा शोध लागला तेव्हापासून रसायनशास्त्राला प्रारंभ झाला. औषधनिर्माण शास्त्रात रसायनशास्त्राचा वापर वाढल्याने मानवाचे आयुष्य वाढले आहे. प्लास्टिकचा वापर विविध क्षेत्रात झाला. मात्र अतिवापरामुळे पृथ्वीचे जीवन धोक्यात आले आहे. शास्वत विकासासाठी आज रसायनशास्त्राचा वापर आवश्यक तेवढाच केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

दिवसभरातील सत्रे – हैद्राबाद येथील शास्त्रज्ञ व विविध आयआयटी संस्थेचे वक्ते डॉ.जव्वाद पटेल यांनी नाविन्यपूर्ण संशोधन याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की, नवीन संशोधनातून मानवी समस्या कशा सोडविता येतील याकडे लक्ष दिले पाहिजे. धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. डॉ.पटेल यांनी कर्करोग निदानासाठी उपकरण तसेच “ग्लुकोबोल” नावाचे मधुमेह नियंत्रणासाठी उत्पादन तयार केले आहे. त्याविषयी त्यांनी माहिती दिली. तामिळनाडू येथील तुतीकोरीन येथील व्ही.ओ.चिदंबरम महाविद्यालयाचे डॉ.सी.वेधी एस.चीन्नापियान यांनीही पर्यावरण विज्ञान आणि रसायनशास्त्र विषयी उहापोह केला. शास्वत विकासासाठी पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य द्यावे लागेल, असे ते म्हणाले.

मुंबई विद्यापीठाचे डॉ.एन.जी.शिंपी यांनी औद्योगिक कंपन्यामधून जे सांडपाणी वाया जाते त्यावर प्रक्रिया करून ते शुद्धीकरणाद्वारे झाडांना देता येते असे सांगत अन्नप्रक्रिया उद्योग, रंग, प्लास्टिक उद्योग, औषधनिर्माण यात विविध रसायनांचा उपयोग केला जातो. तो आरोग्य संवर्धनासाठी कमी मात्रेत झाला पाहिजे हे सांगितले.

समारोप – दिवसभरात ६० पोस्टर सादरीकरण व ४६ शोधनिबंध सादर झाले. राज्यभरातून तसेच देशातील काही महाविद्यालय, विद्यापीठातून संशोधक उपस्थित होते. समारोपावेळी विद्यापीठातील युआयसीटीमधील तेल आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ.जी.ए.उस्मानी उपस्थित होते. मंचावर अध्यक्षस्थानी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.करीम सालार होते. यावेळी डॉ.उस्मानी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ.तन्वीर खान यांनी तर आभार डॉ.मुस्तकीम बागवान यांनी केले. परिषदेसाठी उपप्राचार्य डॉ.युसुफ पटेल, उपप्राचार्य प्रा.आय.एम.पिंजारी, अख्तर शहा, सदाशिव ढाके, डॉ. राजेश भामरे, प्रा. आर.सी.देवकर, प्रा. ए.एस.कुळकर्णी, डॉ.फिरदोस सिद्दिकी, डॉ.हाफिज शेख, डॉ. राजू गवरे, प्रा. कहेकशा अंजुम, प्रा.शबाना खाटिक, डॉ.वकार शेख, डॉ.चांद खान, डॉ. अमीन काझी आदींनी परिश्रम घेतले.