
जालना – लक्ष्मण बिलोरे
जगात एक मानवी प्रवृत्ती अशीही आहे जी दुसऱ्यांची सुखसंपत्ती आक्रमणानी हिरावून घेतात. त्यासाठी साम.. दाम.. दंड.. भेद नितीचा अवलंब करतात.
भारत देश हा तर शिक्षण, साहित्य, कला, अध्यात्म, आरोग्य सगळ्याच ज्ञानविज्ञान शाखांत सुसंपन्न देश. सोन्याचा धूर निघणारा गर्भश्रीमंत देश अशी ख्याती. शिवाय जनता सहिष्णूं. दुष्ट आक्रमकांची पुनश्च वक्रदृष्टी भारताकडे गेली. इंग्रजी सत्तेने कपटाने देशावर राज्य सुरू केले. आमचे ज्ञान.. संस्कृती त्यांनी संपवण्याचा उद्योग सुरू केला. भेदभावाचा अवलंब करुन राज्य सुरु केले.
लोक जागृत होवू लागले. पहिला स्वातंत्र्यासाठी उठाव १८५७ मध्ये झाला. त्यानंतर वासुदेव बळवंत फडकेंनी सशस्त्र उठाव केला. लोकमान्य टिळकांनी देशभर स्वातंत्र्यासाठी जनजागृती करुन संपूर्ण स्वराज्य मागितले.
महात्मा गांधीनी या चळवळीला अहिंसा.. असहकाराचे अधिष्ठान देत सविनय कायदेभंगाचा लढा सुरु केला. तर दुसरीकडे चाफेकर बंधू.. भगतसिंग.. सुखदेव.. राजगुरु.. मदनलाल धिंग्रा अश्या शेकडो क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. सुभाषचंद्र बोस यांनी ‘आझाद हिंद सेना’ उभारुन थेट युद्धच सुरू केले. विनायक दामोदर सावरकरांनी दोन जन्मठेपेची शिक्षा मिळावी एवढा प्रखर लढा दिला. क्रांतीसिंह नाना पाटील यांनी पत्री सरकार स्थापून इंग्रजांना आव्हान दिले.
हा लढा लढताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्याचा आदर्श आणि मनोमन आशिर्वाद होता.
देशभर स्वातंत्र्य प्राप्तीचे यज्ञकुंड धगधगत होते. भारत मातेचे लाखो सुपुत्र आपले जीवन त्यात समिधा म्हणून अर्पण करत होते.
या भारत मातेच्या सुपुत्रांच्या त्याग.. तपस्या.. बलिदानाने प्रदीर्घ प्रतिक्षा अखेर संपली. भारताचे स्वातंत्र्य दृष्टीक्षेपात आले. देशभर असे वातावरण निर्माण झाले की इंग्रज सरकारला देश सोडून जाणे भाग पडले. आता प्रतिक्षा होती ती इंग्रज युनियन जॅक उतरुन भारताचा स्वाभिमानाचा.. अस्मितेचा तिरंगा ध्वज केव्हा फडकणार याची.
भारत मातेला परदास्यशृंखलेतून मुक्त करताना.. त्या निष्ठूर इंग्रजी सत्त्तेशी लढताना सर्वांना स्फुर्ती देणारा एकच मंत्र होता तो म्हणजे “वंदे मातरम्”.











































