
भारतीय संस्कृतीतील सर्वाधिक लोकप्रिय उत्सवांपैकी एक म्हणजे गणेशोत्सव. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हा उत्सव जल्लोषात, भक्तिभावात आणि सामूहिकतेच्या भावनेत साजरा होतो. हा सण सर्व समाजात आणि घराघरात लोकप्रिय आहे. या उत्सवाचा इतिहास केवळ धार्मिकतेशी जोडलेला नसून, त्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक आयामही गुंफलेले आहेत. लोकमान्य टिळकांनी जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनजागृती व जनतेला संघटित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू केली.या माध्यमातून सामाजिक एकोपा संघटनात्मक चळवळी तसेच कला व सांस्कृतिक उपक्रम सुरु करण्याचे त्यांचे धोरण होते. महाराष्ट्र शासनाने आता एक पाऊल पुढे टाकत या गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव राज्य वैभवी बाण्यामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र सुरु आहे.












































